थेऊर येथील गावठाण, वाड्या, वस्त्यांमधील गरजू कुटुंबियांना मदतीचा हात
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्व दूर परिस्थिती फारच गंभीर बनली आहे. लॉकडाउनमुळे सामान्य कुटूंबाची परवड होत आहे. आर्थिक चणचण भासत असून त्यात रोजगार बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. औद्योगिक क्षेत्रात शुकशुकाट जाणवतोय बहुतांशी कंपन्या बंद तसेच काही ठिकाणी मोजक्याच कामगारांद्वारे काम सुरु आहे. काम पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने कंपनी आणि कामगार यांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. दोन्ही धास्तवलेल्या परिस्थितीला तोंड देत आहेत.
अश्या या परिस्थितीचा सामना करणाऱ्या थेऊर येथील गावठाण, वाड्या, वस्त्या मधील गरजू कुटुंबियांना मदतीचा हात दिला. टिश्यू कल्चर क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य कंपनी राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. ही कंपनी गोर गरीब व हातावर पोट भरणाऱ्या गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कंपनीने खारीचा वाटा उचलत सुमारे १००० कुटूंबियांना कोरोनाच्या हाहाकारात माणुसकीचा हात दिला आहे. त्याना आवश्यक अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले यावेळी कंपनीच्या संचालिका डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या हस्ते हे अन्न धान्य किट कुटूंबातील प्रमुखाना देण्यात आले आहे. यात एक महिना पुरेल इतके तांदूळ, तेल, डाळी किराणा साहित्य इ वाटप करून गरजूंना दिलासा दिला आहे. सोशल डिस्टेन्सिग, मास्क, सॅनिटायझर चा वापर करीत सुरक्षा व खबरदारी घेत नागरिकांनी अन्न धान्य स्वीकारले व राईज अँड शाईन कंपनीचे लाभार्थ्यांनी आभार मानले. या अगोदर एप्रिल महिन्यात ९०० कंपनीतील कामगार व नागरिकांना अन्न धान्य किट चे वाटप केले होते.
“काही दानशुर व खऱ्या अर्थाने हृदयापासून कळवळा असणारी माणसे या जगात आहेत ज्यांनी केवळ लोकांच्या चेहऱ्यावरचे आसू पुसून हसू फुलवले आहे यामध्ये डॉ भाग्यश्रीताई पाटील त्यातीलच एक यापूर्वीही त्यांनी अनेक वेळेला मदतीचा हात पुढे करत दीनदुबळ्याना या संकट समयी धीर देत त्याच्या अडचणी समजून मदत केली आहे. आजच्या या प्रसंगी त्या धावून आल्या त्याचे मनापासून आभार” असे मत लाभार्थींयांनी व्यक्त केले.
राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. ही कंपनी बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन आणि फ्लोरीकल्चर क्षेत्रात कार्यरत असून महिला सबलीकरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत आहे. या कंपनीत ९८ टक्के महिला कार्यरत असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. फक्त पाच महिलांपासूनचा ही कंपनी सुरु झाली आज येथे एक हजार महिला या कंपनीत कार्यरत आहे. यामधील बऱ्याचश्या महिला आजूबाजूच्या खेड्यातुन कामासाठी येतात. कमी आर्थिक उत्पन्न गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कठीण काळात या कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणी व औषधोपचार तसेच मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावे यासाठी योगासने ध्यानधारणा शिबिरे आयोजित केली जातात.