तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले !
तिरुवनंतपुरम – सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू असलेला वाद आता आणखी चिघळणार आहे. भक्तांच्या निदर्शनांमुळे 10 ते 50 वर्षे वयोगटाच्या महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जावा या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी येत्या शनिवारी (17 नोव्हेंबर) मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा निर्धार केला आहे.
सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. तसेच देसाईंना विरोध करण्यासाठी केरळमधील नागरिकही विमानतळाबाहेर दाखल झाले आहेत. महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांनी विमानतळाबाहेर गर्दी केल्याने तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच थांबावे लागले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तृप्ती देसाई यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले होते. तसेच मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.
माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे, मला धमक्या येत आहेत’ असं भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच टॅक्सी चालकांनी तृप्ती देसाई यांना निलक्कल येथे घेऊन जाण्यास नकार दिला आहे. कोच्ची विमानतळाबाहेर येणं शक्य न झाल्याने तृप्ती देसाई यांनी तेथेच नाश्ता केला आहे. अयप्पा धर्म सेनेचे राहुल ईश्वर यांनी तृप्ती देसाई यांना मंदिरात न येण्याची धमकी दिली आहे. ‘आम्ही जमिनीवर झोपू, विरोध करू परंतू कोणत्याही परिस्थितीत देसाईंना प्रवेश करू देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.