तुम्ही तुकाराम मुंढेंच्या सोबत आहात की नागपूर महानगरपालिकेच्या? मुख्यमंत्री म्हणाले…
मुंबई: नागपूरमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सतत संघर्ष चालू आहेत. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नेते हे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सतत आरोप करत आहेत. या संघर्षात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही उडी घेतल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची काय भूमिका आहे, असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलेलं आहे.
‘नागपूरचे उदाहरण आहे, तिथे तुकाराम मुंढे महापालिकेचे आयुक्त आहेत. त्यांच्यात आणि नगरसेवकांमध्ये सतत वाद सुरू आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी देखील त्यांनी पंगा घेतलाय,’ असं म्हणत मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की त्या लोकनियुक्त महापालिकेच्या, जी मुंढे यांच्या मागे लागलीय हात धुऊन? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
‘मला असं वाटतं की, तुकाराम मुंढे आल्यापासून तिथे शिस्त लागलेली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे…मी शिस्तीच्याच मागे कायम उभा आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढेंची पाठराखण केलेली आहे.
तुकाराम मुंढेंच्या कठोरपणाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?
‘कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱयाच्या पाठी सर्वांनी ठामपणे उभं राहायला हवय. आततायीपणा कोणीच करू नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघडय़ा डोळय़ांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरून चालणार नाहीये. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.