तुम्हाला मते देऊन आमचा काही उपयोग झाला नाही, कामगारांचा अमोल कोल्हेंसमोर तक्रारींचा पाढा
पुणे |महाईन्यूज|
साहेब… तुमच्या एका फोननी आमची नोकरी आम्हाला मिळेल, पण तुम्हाला मते देऊन आमचा काहीच उपयोग झाला नाही, असं त्रासलेल्या कामगारांनी खासदार अमोल कोल्हेंसमोरच आपली व्यथा मांडली.
शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जनता दरबार राजगुरुनगर येथे पहिल्यांदाच भरला. या जनता दरबारात सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सुटतील या आशेने अनेकांनी जनता दरबारात हजेरी लावली आणि आपल्या प्रश्नांचा पाढा मांडला मात्र कामगारांसह शेतकऱ्यांनी असंख्य प्रश्न या जनता दरबारात मांडले मात्र अनेकांची निराशाच झाली.
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पहिला जनता दरबार शनिवारी रात्री उशिरा पर्यंत सुरूच होता. मात्र, उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देता-देता डॉ कोल्हे यांची चांगलीच दमछाक झाली. चाकण एमआयडीसी व खेड सेझ परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. मात्र कामगारांच्या हाती काम मिळालं नाही. शेतीला पाणी नाही, हाताला काम नाही असं म्हणत कामगारांनी खासदार कोल्हे यांच्या जनता दरबारात प्रश्न मांडला. मात्र, कोल्हे यांना अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.