तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल – हसन मुश्रीफ
कोल्हापूर – बेळगाव प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असे वक्तव्य केल्यानंतर त्यावर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सवदी यांच्यावर सडकून टीका केली असून ‘तुमचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल’, अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून बेळगाव हा महाराष्ट्रासाठी अस्मितेचा प्रश्न राहिलेला आहे. तसाच बेळगावचा भाग कर्नाटकसाठी प्रतिष्ठेचा होऊन बसला आहे. याच कारणामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात कधी शाब्दिक चकमकी तर कधी हिंसाचारही उसळत आला आहे. त्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे, असे वक्तव्य केले. ‘जोपर्यंत सूर्य, चंद्र असेल तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही’, अशी मुक्ताफळे सवदी यांनी उधळली.
सवदी यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘चंद्र-सूर्य कशाला, तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल’, अशी चपराक मुश्रीफ यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सवदी यांना लगावली.