‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप?
छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे अनेकांच्या जगण्याचा भाग झालेला असतो. तुझ्यात जीव रंगला ही मालिकाही त्यापैकीच एक. अतिशय लाघवी आणि सोज्वळ स्वभावाच्या पाठक बाई आणि तितकाच रांगडा असलेला राणादा यांनी प्रेक्षकांना मागच्या अनेक दिवसांपासून अक्षरश: वेड लावले होते. मात्र आता ही मालिका बंद होण्याच्या वाटेवर आहे. तशा चर्चाही रंगल्याचे चित्र आहे. आता तुम्ही म्हणाल हे कशावरुन? अधिकृतरित्या हे जाहीर करण्यातच आले नसले तरीही ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ज्यावेळी प्रसारित होते त्याचवेळी एक नवी मालिका सुरु होत असल्याच्या जाहिराती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका बंद होण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पाठबळ मिळाले आहे.
आता या वेळात म्हणजेच सायंकाळी ७.३० वाजता नेमकी कोणती मालिका सुरू होणार असा प्रश्न तुमच्यातील काहींना पडला असेल, तर ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकु’ असे नव्या मालिकेचे नाव आहे. सध्या इंग्रजी आणि मराठी शीर्षके असलेल्या मालिकांचा ट्रेंड असताना ही नवी मालिका नेमके काय घेऊन येणार याबाबत मराठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठीवर नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ही नवीन मालिका २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचेही त्यामध्ये सांगितले जात आहे. त्यामुळे अनेकांचे लाडके असलेले राणादा आणि पाठक बाई २१ ऑक्टोबरनंतर छोट्या पडद्यावर दिसणार की नाही असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरु झाली असून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठी चॅनेलवर प्रदर्शित होते. या मालिकेत हार्दिक जोशी (राणा दा), अक्षया देवधर (पाठक बाई ), छाया सानगावकर (गोदाक्का), धनश्री काडगावकर (नंदिता), राज हानचांगले (सनी दा), अमोल नाईक (बरकत), दिप्ती सोनावणे (चंदा) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत.