तीन-दोनचा फॉर्म्युला भाजपला अमान्य – रामदास आठवले
मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना – भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी पुन्हा युतीचे सरकार यावे यासाठी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तीन-दोनचा नवा फॉर्म्युला मांडला. तो शिवसेना नेते संजय राऊत यांना सांगितला. तो त्यांना मान्य होता, असा दावा आठवले यांनी केला होता. हाच फॉर्म्युला भाजपसमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आपण हा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला. त्यांना तो मान्य नाही, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अनैसर्गिक असल्याचीही टीका आठवले यांनी केली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी ही अनैसर्गिक आघाडी टिकणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वाविरुद्ध ही आघाडी आहे, बाळासाहेबांचे नाव पुढे करून शिवसेना राजकारण करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तर दुसरीकडे तीन-दोनचा फॉर्म्युला भाजप-शिवसेनेने मान्य करावा, अशी मागणी त्यांनी केली.