तिवरे धरण पुन्हा बांधले जाणार; भूगर्भतज्ज्ञांकडून पाहणी
रत्नागिरी – संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तिवरे धरणफुटीच्या घटनेला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं आहे. 2019च्या जुलै महिन्यात कोकणातील तुफान पावसाने चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले होते. संपूर्ण गाव साखर झोपेत असतानाच रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास हे धरण फुटल्यानंतर 21 जणांचा जीव गेला होता. 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मात्र हे धरण नेमके कशामुळे फुटले? याचे उत्तर अद्यापही मिळू शकलेले नाही. परंतु आता हे धरण नव्याने बांधले जाणार आहे. भूगर्भतज्ज्ञांकडून या धरणाची पाहणी करण्यात आली असून आणखी एक तपासणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हे धरण मातीचे न होता पक्क व्हावे, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.
वाचा :-राज्यात थंडीच्या दिवसात पावसाचा अंदाज
तुफान पावसामुळे चक्क धरणच फुटल्याने परिसरातील ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावात पाणी घुसले होते. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की त्यामध्ये 24 नागरिक वाहून गेले. तसेच तिवरे बेंडवाडीतील 13 घरे वाहून गेली होती. आजूबाजूच्या गावातही पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, फुटलेल्या तिवरे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2 हजार 452 दशलक्ष घनफूट इतकी होती. तर धरणाची लांबी 308 मीटर तर उंची 28 मीटर होती.