…तर राहुल गांधींविरोधात ‘अंडी मारो’ आंदोलन करु-आठवले
दिल्ली|महाईन्यूज
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘दंडा मार’ची भाषा केली तर आम्ही त्यांच्याविरोधात अंडी मारो आंदोलन करु असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलेला आहे. राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्यानेच अमेठीतून ते निवडणूक हरले. राहुल गांधी हे स्वतःच काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. ते अशाच प्रकारे बोलत राहिले तर काँग्रेस पक्ष संपेल अशीही टीका आठवलेंनी केली आहे.
काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये ते म्हणाले होते की, ” सध्याच्या घडीला आपल्या देशातली सगळ्यात मोठी समस्या ही बेरोजगारीची आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर सहा महिन्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना युवा वर्ग घराबाहेर पडू देणार नाही. समजा ते बाहेर पडलेच तर त्यांना लाठ्या काठ्यांनी चोप देईल.” राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद लोकसभेतही उमटलेले आहे. ज्यांचे वडील देशाचे पंतप्रधान होते अशा व्यक्तीने देशाच्या पंतप्रधानांबाबत असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे अशी टीका भाजपाने केली आहे.