…तर डीजीपी गुप्तेश्वर पांडे नक्कीच बिहारचे गृहमंत्री असते – जितेंद्र आव्हाड
मुंबई| अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. आतापर्यंत जमा करण्यात आलेले पुरावेसीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले. यानंतर बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे चांगलेच चर्चेत आहेत. आता जिंतेंद्र आव्हाडांनी गुप्तेश्वर पांडेंवर निशाणा साधला आहे.
मागील काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरुन राजकारण तापलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर या वादाला पुर्णविराम मिळाला. मात्र बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे या प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप लावण्यात येत आहे. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओचा हवाला देत गुप्तेश्वर पांडेंवर निशाणा साधला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचा निकाल दिला यानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेंश्वर पांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. हा न्यायाचा अन्यायावर विजय आहे. एकट्या गुप्तेश्वर पांडेचा विजय नाही तर हा देशातील 130 कोटी जनतेचा विजय आहे, असे म्हणत त्यांनी याविषयावर राजकीय नेत्याप्रमाणे भाषणच ठोकले. यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडिओ शेअर करुन त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याचबरोबर ‘नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या रुपात परत आले, तर हे पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील,’ अशी टीका आव्हाड यांनी पांडे यांच्यावर केली आहे.