‘…तर काही तरी गौडबंगाल आहे’; राम कदम यांची टीका
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने नोटीस बजावली. यानंतर सामानातून भाजपावर निशाणा साधला. यावर भाजपाचे आशिष शेलार, केशव उपाध्ये, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यानंतर राम कदम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.
“स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत ‘सामना’मध्ये लिहित होते तोपर्यंत ते एक वर्तमानपत्र होतं. आता मात्र ते केवळ एका पक्षाची जाहिरात करण्यासाठी सुरू असलेलं हॅण्डबिल आहे. सामनामध्ये हल्ली राम मंदिराबरोबरच बाबरी मशीदचाही उल्लेख होतो. राम मंदिराचा निर्णय लवकर लागू नये म्हणून ज्या काँग्रेस पक्षाने वकिलांची फौज उभारली, त्याच हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत आहे. ही दुटप्पी भूमिका कशी चालेल? ‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला”, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांचा समाचार घेतला.
“नोटीशीला घाबरायचं काय कारण? कर नाही त्याला डर कशाला? आणि जर काही कारणाने घाबरले असाल तर याचा अर्थ नक्कीच काही तरी गौडबंगाल आहे. कुठेतरी पाणी मुरतंय हे समजायला महाराष्ट्राची जनता निश्चितपणे हुशार आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.