जळगावातील शेतक-यांना विमा योजनेचे 24 कोटी मिळालेच नाहीत
न्यायासाठी खासदाराची मंत्र्यांना विनंती
नवी दिल्ली – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरविणा-या जळगाव जिल्हयातील 16 हजार 757 शेतक-यांना त्यांच्या वाटयाची 24 कोटी 80 लाखांची रक्कम लवकर प्रदान करण्यात यावी, अशी मागणी जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील यांनी आज केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांना निवेदनाद्वारे केली आहे.
पाटील यांनी कृषी भवन येथे आज राधामोहन सिंह यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, वर्ष 2017 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्हयातील 72 हजार 254 शेतक-यांनी पीक विमा उतरविला व प्रिमीयमची रक्कमही भरली. वर्ष 2017 च्या खरीप हंगामात निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतीचे नुकसान झाले. परिणामी जिल्हयातील 34 हजार 167 शेतक-यांनी 44 कोटी 71 लाखांच्या मोबदल्यासाठी अर्ज दाखल केले.
मात्र, विमा कंपनींकडून गेल्या वर्षभरापासून यातील 16 हजार 757 शेतक-यांना त्यांच्या वाटयाची 24 कोटी 80 लाखांची रक्कम मिळालेली नाही. दरम्यान, पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री गोयल यांनाही आज या मागणी संदर्भात निवेदन सोपविले आहे.
खरीपाचा हंगाम सुरु झाला असून मशागत व पेरणीसाठी शेतक-यांना पैशांची गरज पाहता त्यांना विम्याची रक्कम तत्काळ मिळणे आवश्यक आहे. जिल्हयातील शेतक-यांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्याचे पैसे मिळावे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री व केंद्रीय अर्थमंत्री यांनी संबंधितांना आदेश करावे व जळगाव जिल्हयातील शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.