जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा सूचक इशारा ‘त्या’ आमदारांना इशारा म्हणाले ‘राजकारणातून बाद केले जाईल’
मुंबई: राज्यातील महाविकासआघाडी सरकार पडणार अशी अफवा भाजपवाले सतत पसरवत असतात. परंतू, महाविकासआघाडी सरकार पूर्णपणे स्थिर आहे. राज्यातील सरकार पडेल असे सांगणे हा केवळ भाजपचा स्वत:ला चर्चत ठेवण्याचा प्रयत्न आहे. महाविकासआघाडी सरकारमधून जर कोणी एखादा आमदार फुटलाच तर त्या आमदाराला राजकारणातून बाद केले जाईल, असा थेट इशारा राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. राजस्थानमध्ये काय घडले हे उदाहरण समोरच असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावलेला आहे. जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
जयंत पाटील यांनी इशारा दिला की, जर एखादा आमदार महाविकासआघाडीतून फुटून इतरत्र गेलाच तर महाविकाआघाडीतील राष्ट्रावादी, शिवसेना आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन एक उमेदवार देतील आणि संबंधीत उमेदवाराचा पराभव करतील. त्यामुळे शक्यतो कोणताही आमदार अशा प्रकारचे धाडस करणार नाही. सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे राज्यासमोर आर्थिक अडचणी जरुर उभ्या आहेत. परंतू कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर हे राज्य पुन्हा गतीमान होईल, भरारी घेईन, असेही पाटील यांनी सांगितलेले आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने करत होते. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या तपासाचे कौतुक केलेले आहे. फक्त मुंबई पोलिसांना आपल्या तपासाचे सादरीकरण योग्य वेळत करता आलेले नाही. त्यामुळे पोलिसांवर काही प्रमाणात टीका झाली इतकेच घडले. देशात आज मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. कोरोना व्हायरस, वाढती महागाई, बेरोजगारी यांसह इतरही अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतू, या मुद्द्यांवर चर्चा न करता सुशांत प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रणाणावर केली जात आहे.