जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया, वाहतुकीला अडथळा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
आकुर्डीत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वाहत्या पाण्याच्या दाबाने रस्त्याच्या डांबरीकरणावर 20 फुटापेक्षा जास्त लांबीची भेग पडली. नागरी सुरक्षा कृती समितीचे कार्यकर्ते प्रशांत शिंपी यांनी सतर्कता बाळगून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. ही घटना सोमवारी (दि. 9) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
दरम्यान, पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता, की वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. मात्र, शिंपी यांनी सतर्कता ओळखून वेळीच रामनगरकडे जाणारी वाहतूक वळवली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना थांबवून त्यांचे सहकार्य घेतले. काही वेळानंतर समितीचे अध्यक्ष विजय पाटील, सतीश देशमुख, बाबासाहेब घाळी, अमित डांगे, अमोल कानु हे त्याठिकाणी पोहोचले.
त्यांनी तातडीने खंडोबा मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील विभागातील कामगारांना याबाबत माहिती दिली. परंतु, परिस्थितीचे गांभिर्य त्यांनी लक्षात घेतले नाही. तोपर्यंत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वर्कशॉपमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. तेथे काम करणाऱ्या कामगारांची एकच धावपळ उडाली.