जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई पुन्हा सुरु होणार
नवी दिल्ली– जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने काल जाहीर केले. रमजान महिन्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या शस्त्रसंधीला मुदतवाड न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे प्रसिद्धी निवेदनामध्ये म्हटले आहे. श्रीनगरमध्ये ज्येष्ठ संपादक शुजात बुखारी यांची हत्या झाल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.
दरम्यान जम्मू काश्मीरमधील वातावरण भयमुक्त आणि हिंसाचारमुक्त करण्यास करकार कटिबद्ध असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. रमजान महिन्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई न करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने 17 मे रोजी घेतला होता. रमजान महिन्यामध्ये मुस्लिमांमध्ये भयाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. सुरक्षा रक्षकांनी रमजानच्या काळामध्ये कमालिचा संयम दाखवला. मात्र तरिही दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले करणे सुरुच ठेवले. . त्यामध्ये अनेकजण मरण पावले आहेत, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
आता दहशतवाद्यांना आणखी हल्ले करण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दलांना सूचना देण्यात आल्या आहेत. समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे दहशतवादी आणि तरुणांची दिशाभूल करणाऱ्यांविरोधातील कारवाईला पाठिंबा द्यावा, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. या वर्षभरात काश्मीर खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसाचारात 55 दहशतवादी आणि 27 स्थानिक नागरिक मरण पावले आहेत. गेल्या चार महिन्यात काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या 80 घटना घडल्या आहेत. दहशतवाद्यांनी काल श्रीनगरच्या जवळ लासजान येथे केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे.