चिंचवडमध्ये स्वच्छतागृह बाहेरुन ‘चकाचक’, आतून ‘डर्टी’; आयुक्तसाहेब, सांगा…कोणावर करणार कारवाई?
- स्वच्छ भारत अभियानाची एैसी-तैशी, ठेकेदारांवर कारवाई करा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छ भारत अभियानाचा बोजबारा उडाला आहे. महापालिका आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्चून आणि विविध कंपन्याच्या सीएसआर फंडातून चाैकाचाैकात संडास, मुता-या उभारल्या. तसेच त्या स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवण्यासाठी लाखो रुपये देवून ठेकेदारांना कामे दिली. मात्र, ठेकेदार कागदोपत्री स्वच्छता केल्याचे दाखवून लाखो रुपयाची बिले वसूल करु लागले आहेत. त्यामुळे अनेक स्वच्छतागृह बाहेरुन चकाचक अन्ं आतून डर्टी असल्याचे वास्तव समोर आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छ भारत अभियान राबवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहसमोरील आणि लोकमान्य हाॅस्पीटल शेजारील स्वच्छतागृहे दुर्गंधीयुक्त झाली आहेत. या परिसरात नागरिकांचा सतत वर्दळ असते. त्या स्वच्छतागृहाचा वापर नागरिक करीत असतात. त्या स्वच्छतागृहाची वेळेवर साफसफाई होत नाही. शहरातील चाैकाचाैकात उभारलेल्या स्वच्छतागृहाचा स्वच्छतेचा प्रश्न कायम ऐरणीवर राहिला आहे. स्वच्छतागृहाची देखभाल दुरुस्ती, वेळेवर स्वच्छता न केल्याने स्वच्छतागृहे दुर्गंधीयुक्त बनली आहे.
महापालिकेने शहरातील अनेक चाैकाचाैकात महिला व पुरुषांची गैरसोय होवू नये, म्हणून मुता-या व संडास बांधण्यात आलेल्या आहेत. त्या मुता-या व संडास हे अनेक कंपन्याच्या सीएसआर फंड आणि स्वच्छ भारत अभियानच्या निधीतून उभारण्यात आले. महापालिकेच्या स्वच्छतागृहांची देखभाल व स्वच्छतेसाठी आठही प्रभागातून ठेकेदार नेमलेले आहेत. त्या ठेकेदारांकडून स्वच्छतागृहांची स्वच्छता होणे अपेक्षित आहे. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अनेक ठेकेदार कागदोपत्री स्वच्छता केल्याचे दाखवून बिले लाटत आहेत. त्या ठेकेदारांना महापालिका आरोग्य अधिका-यांचा आर्शिवाद असल्याने ठेकेदार कामे करीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतागृहाची अवस्था दैयंनिय झाली आहे.
दरम्यान, महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत आरोग्य व स्वच्छतेबाबत कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांची गय करणार नसल्याचे ठणकावून सांगितले. मात्र, चिंचवडमधील रस्त्याच्या कडेला असणा-या दोन स्वच्छतागृहांच्या साफसफाईवरुन आरोग्य विभागाचा किती गलथान कारभार सुरु आहे. हे सत्य वास्तव उघडकीस येत आहे. त्यामुळे आयुक्तासाहेब… आता तुम्हीच सांगा… कधी करणार कारवाई, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारु लागले आहेत.
आरोग्य कार्यकारी अधिका-यांचे निलंबन करा.
महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छतागृहावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले. आठही क्षेत्रीय कार्यालातंर्गत चकाचक संडास, मुताऱ्या उभा करण्यात आल्या. शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिकेने या संडास-मुताऱ्या साफ सफाईचे लाखो रुपयाचे ठेके दिले. पण या ठेकेदारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित आरोग्य अधिकारी यांना दिली. पण प्रत्यक्षात हे अधिकारी आपले कर्तव्य बजावतात काय ? आठच दिवसापूर्वी आयुक्तांनी स्वच्छतेबाबत कर्तव्यात कसूर करणा-र्याची गय केली जाणार नसल्याचे म्हटले होते. मग आता कर्तव्यात कसूर करून आरोग्य अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्या आरोग्य कार्यकारी अधिका-यांचे तत्काळ निलंबन करा, तसेच क्षेत्रीय आरोग्य अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी जागृत नागरिक महासंघाचे नितीन यादव यांनी केली आहे.