रेणू शर्मा यांच्यावर राजकीय दबाव, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट
नागपूर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजकीय दबावातून तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी केल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तसेच हे प्रकरण संपलेलं आहे. मात्र, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले होते, त्याबाबतही रेणू शर्मा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन तक्रार मागे घेतली होती. यावेळी तक्रार मागे घेताना त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याचाच आधार घेत अनिल देशमुख यांनी वरील वक्तव्य केलं.
“रेणू शर्मा यांनी त्यांची तक्रार मागे घेतली हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. राजकीय दबावापोटी तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य रेणू शर्मा यांनी केलेलं आहे. हा विषय आता संपला आहे. मात्र, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप केले ते चुकीचे होते, या सगळ्याबद्दल रेणू शर्मा यांनी सांगितलं आहे,” असं देशमुख म्हणाले.