चंद्रपूर, बल्लारपूर शहरात चार दिवस जनता संचारबंदी
चंद्रपूर – जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर महापालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात गुरुवार, १० सप्टेंबर ते रविवार, १३ सप्टेंबरपर्यंत जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी असोसिएशन तसेच लोकप्रतिनिधींच्या सर्वसंमतीने घेण्यात आला.
सर्व रुग्णालये, औषधालये, कृषी केंद्र, बँका, शासकीय कार्यालय, तसेच एमआयडीसीमधील सर्व आस्थापने या काळात सुरू राहतील. दूध वितरण, पार्सल सुविधा, सर्व पेट्रोल पंप, वर्तमानपत्रांचे वितरण, भाजीची दुकाने, किराणा दुकानेदेखील सुरू राहतील. मात्र सर्व पान ठेले, चहाच्या टपऱ्या, फुटपाथवरील दुकाने बंद ठेवण्यात येतील. नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी केले