गौतमने दिलं ‘गंभीर’ विषयावर स्पष्टीकरण, म्हणाला…
भारताचा आक्रमक माजी सलामीवीर गौतम गंभीर याने डिसेंबर महिन्यात निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत शेवटचा सामना खेळून त्याने क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला. त्यानंतर गंभीरने समालोचक म्हणून आपली कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली. पण या दरम्यान त्याने एक महत्वाचे ट्विट करत गंभीर विषयावर भाष्य केले आहे. दिल्ली किंवा अन्य कुठेही माझे कोणतेही हॉटेल नाही, असे त्याने ट्विट केले आहे.
‘मित्रांनो, मध्य आणि पश्चिम दिल्लीत माझ्या नावाची अनेक हॉटेल, बार, पब आहेत. मात्र मी हे स्पष्ट करतो की अशा प्रकारच्या कोणत्याही हॉटेल किंवा पबमध्ये माझी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक नाही किंवा भागीदारी नाही. स्पष्टच सांगायचे झाले, तर माझे जगात कुठेही हॉटेल, पब किंवा बार किंवा तत्सम काहीही नाही’, असे त्याने स्पष्ट केले आहे.
एखाद्या मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने हॉटेल काढले, तर ते चांगले व्यापार करते. त्यामुळे अनेक मोठ्या क्रिकेटपटूंच्या नावाने हॉटेल काढलेली दिसतात. त्यातील अनेक हॉटेल्सची मालकी क्रिकेटपटुंकडेदेखील आहे. याच पद्धतीने गौतम गंभीरच्या नावानेही दिल्लीत अनेक हॉटेल्स सुरु करण्यात आलेली दिसली. त्यावर गंभीरने हे स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, गंभीरने २०१६मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना खेळला होता. त्याने ५८ कसोटी सामन्यांमध्ये ४१५४ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यांत ५२३८ धावा आणि टी२० सामन्यांमध्ये एकूण ९३२ धावा केल्या आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये क्रिकेटविश्वातील आपला शेवटचा सामना त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध खेळला.