गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूका लढणार नसल्याचा निर्णय घेतला. केंद्रातील एनडीए सरकारविरोधात गेली पाच वर्षे राज ठाकरे यांनी सातत्याने टीका केली आहे. येत्या गुढी पाडव्याला राज ठाकरे मेळावा घेणार आहेत. मनसे कार्यकर्ते जोमाने गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे कार्यकर्ते मेळाव्याच्या तयारीसाठी ऑनलाइन कॅम्पेनचा आधार घेत असून ‘गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व!’ हे कॅम्पेन सोशल नेटवर्किंगवर सुरु केले आहे.
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर कॅम्पेन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व” या वाक्यावर भर देण्यात आला आहे. “निवडणूक येतात आणि जातात! पण अशी सभा होणे नाही!” अशी या कॅम्पेनची टॅगलाईन आहे. या पोस्टरवर राज ठाकरेंबरोबरच शालिनी ठाकरेंचाही फोटो पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणूका लढणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर मतदानाच्या अगदी काही दिवस आधी पाडव्याला त्यांना आपली बाजू मांडायची संधी मिळणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष राज ठाकरेंच्या सभेकडे लागलं आहे. राज ठाकरे आपली नरेंद्र मोदी विरोधाची धार पुढेही कायम ठेवतील. राज ठाकरेे गुढीपाडवा मेळाव्यामध्ये केंद्र सरकारवर कोणत्या मुद्द्यांवरुन हल्लाबोल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.