खासदार श्रीरंग बारणे यांना सलग पाचव्या वर्षी ‘संसद रत्न’ पुरस्कार प्रदान
पिंपरी ( महा ई न्यूज ) – १६ व्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल श्रीरंग बारणे यांना पंतप्रधान पाँईट फाऊंडेशनच्या वतीने सलग पाचव्या वर्षी ‘संसदरत्न’ पुरस्काराने काल सन्मानित करण्यात आले.
प्रथमच निवडून गेलेल्या खासदारांमध्ये श्रीरंग बारणे यांना लोकसभेमध्ये केलेल्या कामकाजाबद्दल दि. १९ जानेवारी रोजी तामिळनाडू येथील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात तामिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी मुख्य निवडणुक आयुक्त श्री. टी .कृष्णमुर्ती, प्राईम पाँईट फाऊंडेशनचे अध्यक्ष के.श्रीनिवास यांच्या शुभहस्ते ‘संसद रत्न’ पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या बरोबर काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री डॉ. एम. विराप्पा मोईली, ओरिसाचे बिजू जनता दलाचे खासदार भर्तूहरि मेहताब, खासदार आनंदा भास्कर रापलू, खासदार डॉ. निशिकांत दुबे, खासदार एन.के.प्रेमचंद्रन, खासदार अनुराग ठाकूर व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित व राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनाही ‘संसदरत्न’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
खासदाराची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नोत्तरांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थीती, मतदार संघात केलेली विकास कामे यासंदर्भात पीआरएस इंडीयाने दिलेल्या आकडेवारीवरुन कामगिरीचा आढावा घेऊन लोकसभा सचिवालयामार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मुल्यांकन निवड समिती मार्फत करण्यात येते
त्यानुसार चेन्नई येथील पंतप्रधान पाँईट फाऊंडेशनच्या वतीने ‘संसद रत्न’ हा पुरस्कार दिला जातो. १६ व्या लोकसभेच्या गेल्या ५ वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी १०७६ प्रश्न उपस्थित केले, २८९ वेळा प्रत्यक्ष चर्चेतील सहभाग घेतला, ९३ टक्के उपस्थिती दर्शविली. तसेच २० खाजगी विधेयेके मांडले त्याचबरोबर विविध समितींच्या बैठकीमध्ये सर्वाधिक उपस्थिती आणि स्थानिक खासदार विकास निधीचा सर्वाधिक वापर करून विविध विकासकामे पूर्णत्वास नेली. या कामगिरीबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांना सलग पाचव्या वर्षी पुरस्कार मिळावला आहे. बारणे सलग पाच वर्ष पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रतील एकमेव खासदार आहेत.