खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ
नागपूर – अतिवृष्टी आणि पावसामुळे तेलबियांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. तसेच आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्याने खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल, सरकी आणि पामतेलाचा समावेश आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,42,136 वर
सर्वसामान्य नागरिकांकडून स्वयंपाकासाठी पामतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर अन्नप्रक्रिया उद्योगातही पामतेलाचा वापर होतो. मात्र पामतेलाची किंमत आता जवळपास 120 हून अधिक झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे सोयाबीन तेलाचा दर 135 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे. तसेच सूर्यफुलाच्या तेलाची किंमत 145 रुपये प्रति किलो झाली आहे.
वाचा :-राज्यात थंडीच्या दिवसात पावसाचा अंदाज
दरम्यान, भारतात सर्वसाधारणपणे 70 टक्के खाद्यतेल हे परदेशातून आयात केले जाते. तर 30 टक्के भारतात तयार होते. यंदा कोरोना संकटामुळे अन्य देशांमधून होणारी खाद्यतेलाची आयात ठप्प झाली होती. त्यातच केंद्र सरकारने पामतेलावरील आयात शुल्क वाढवले. त्याचा परिणाम खाद्यतेलांच्या किंमतीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणामही खाद्यतेलाच्या निर्मितीवर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे बाजारात खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली वाढ पुढील 2 ते 3 महिने कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
किरकोळ बाजारातील तेलाचे दर (प्रति किलो)
– सोयाबीन तेल – 135 रुपये
– सरकी तेल – 115 रुपये
– सूर्यफूल तेल – 145 रुपये
– पामतेल – 121 रुपये
– शेंगदाणा तेल – 160 रुपये