खातेवाटप : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये खेचाखेची, वादाचा चेंडू शरद पवारांच्या कोर्टात
मुंबई | महाईन्यूज
राज्यातील महाविकास अघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. याला पाच दिवस उलटले तरी खातेवाटपाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये समन्वय साधला जात नसल्यामुळे खातेवाटपाचा घोळ वाढत चालला आहे. आता या वादाचा चेंडू महाविकास आघाडीचे निर्माते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोर्टात गेला आहे.
मंत्रीमंडळातील खातेवाट आज सकाळी होईल, संध्याकाळपर्यंत होईल, किंबहुना उद्या सकाळपर्यंत होईल, असे महाविकास आघाडीतले नेतेमंडळी गेल्या चार दिवसांपासून सांगत आहेत. खातेवाटप जाहीर करण्यास नेमका कधीची मुहूर्त लागणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. परंतु, काँग्रेसमुळे हे खातेवाटप रखडल्याची चर्चा आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला कृषी आणि ग्रामविकास हे खाते हवे आहे. सहकार खात्यावरही काँग्रेसने हक्क सांगितला आहे. मात्र, शिवसेना कृषी खातं सोडण्यास नकार देत असल्यामुळे ओढाताण होऊ लागली आहे. दुसरीकडे, बंदरे, खारभूमी, सांस्कृतिक खाती देण्यास शिवसेना तयार आहे. मात्र, कमी महत्त्वाची खाती घेण्यास काँग्रेसचा नकार आहे. त्यामुळे खातेवाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफूस सुरु असल्याचं म्हटलं जातं.
हा वाद अधिकच चिघळत जात आहे. आता खातेवाटपाचा वाद शरद पवार यांच्याकडे आला आहे. पवार काय निर्णय घेतील, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
निर्णायक बैठकीत शिवसेनेने आपल्या पारड्यात तब्बल 24 खाती पाडून घेतली. तर, गृह खातं राष्ट्रवादीला सोडल्याने सेनेकडे आता 23 खाती आहेत. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. या सर्व मंत्र्यांना कोणते खातं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
खातेवाटपाचा घोळ कायम असल्याने पालकमंत्रिपदांची वाटणीही रखडली आहे. तूर्तास 13-13-10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.