‘कोल्हापूर पॅटर्न’ची मावळात पुनरावृत्ती नाही, विरोधकांना भेटण्यास खासदार श्रीरंग बारणेंचा नकार
- पाणी, रस्ते, रेल्वेंचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास राहणार भर
- खासदार श्रीरंग बारणेंकडून खिलाडूवृत्तीचे दर्शन नाही
पिंपरी ( महा ई न्यूज ) – हातकंणगले लोकसभेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी त्याचे प्रतिस्पर्धी व कट्टर विरोधक असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी भेट देवून त्याच्या आईचे आर्शिवाद घेतले. त्यामुळे सोशल माध्यमावर राजकारणातील ‘नवा कोल्हापूर पॅटर्न’ समोर आला आहे. यावरुनच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना ‘तुम्ही विरोधक उमेदवारांना भेटणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी विरोधक असलेल्या पार्थ पवार यांना भेटण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यामुळे शिवसेना खासदारामध्ये खिलाडूवृत्ती नसल्याचे दिसून आले आहे.
पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे बोलत होते. यावेळी आमदार गाैतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष योगेश बाबर, मावळचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, नगरसेवक प्रमोद कुटे, अनंत को-हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हातकंणगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी त्याचे प्रतिस्पर्धी व कट्टर विरोधक असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी भेटी घेतली. निवडणुक निकालानंतर सर्व मतभेद विसरुन पुरोगामी महाराष्ट्रात नवा कोल्हापुरी पॅटर्न समोर आणला आहे. परंतू, मावळ लोकसभा मतदारसंघात चित्र वेगळे आहे.
विरोधक असलेल्या उमेदवारास भेटणार का? याबाबत महाआघाडीचे पार्थ पवार यांचे नाव न घेता, मावळ लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, विरोधी उमेदवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातील नव्हते. ते बाहेरील मतदारसंघातून येवून उमेदवार म्हणून उभे होते. मावळ मतदारसंघातील जाण असलेला उमेदवार याठिकाणी असता तर निश्चितपणे त्यांची भेट घेतली असती, असे ते म्हणाले. त्यामुळे कोल्हापूर पॅटर्नची पुनरावृत्ती मावळ लोकसभेत होणार नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यास भर राहणार आहे. पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, हिंदुस्थान अॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनी पुर्नजिवीत करणे, रेड झोन, उद्योगधंद्यांना चालना देणे, मेट्रो प्रकल्पाला गती देणे, नदी सुधार प्रकल्प, गड-किल्यांचे संवर्धन, पर्यटन विकासाला चालना देण्यास प्राधान्य देणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गोरगरीब नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.