कोल्हापूरात ऊस दर आंदोलन चिघळले, वाहनांची जाळपोळ
कोल्हापूर |महाईन्यूज|
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर आंदोलन चिघळले आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे नुकतेच सुरू झालेल्या साखर कारखान्यांच्या ऊस गाळपावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः शिरोळ व हातकंणगले तालुक्यात उसदराचे आंदोलन चिघळले आहे.
कर्नाटकातील कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले. कर्नाटकातीलही काही साखर कारखानदार 2700 रुपये प्रति क्विंटल असा भाव देत आहेत. याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. काही शेतकऱ्यांना 2700 रुपये दर सांगून 2200 रुपये देत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे. यातूनच हे हिंसक आंदोलन होत आहे.
दरम्यान, शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे कर्नाटकातील अथणी शुगर्सकडे ऊस वाहतूक करणारा एक ट्रक्टर पेटवून देण्यात आला. तर सहा ट्रक्टरच्या चाकातील हवा सोडून आंदोलकांकडून ऊस वाहतूकीवर प्रतिबंद लावण्यात आले. यासोबतच हातकंणगले येथे कर्नाटकातील बेडकीहाळ येथील व्यकंटेश्वरा कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून आंदोलकांकडून ऊस वाहतूकही रोखण्यात आली आहे.