कोलकाता सहा गडी राखून विजयी…
- आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा
कोलकाता – कुलदीप यादव (20-4), आंद्रे रसेल (13-2) व प्रसिद्ध कृष्णा (35-2) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 49 व्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा डाव 19 षटकांत सर्वबाद 142 धावांवर रोखला गेला. 18 षटकामध्ये 4 गडी गमावत कोलकाता संघाने 145 धावा बनवीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याच्या ख्रिस लिन आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी चांगली फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. लिनने 42 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. लिन बाद झाल्यावर कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवला. त्याने 31 चेडूंत 5 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 41 धावा केल्या आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला राहुल त्रिपाठीने 15 चेंडूूंत 4 चौकार व 1 षटकारासह 27 धावा फटकावताना जोस बटलरच्या साथीत 4.5 षटकांत 63 धावांची झंझावाती सलामी दिली. परंतु रसेलने त्रिपाठीला बाद करून ही जोडी फोडली. त्याआधी त्रिपाठी-बटलर जोडीने दुुसऱ्या षटकांत 19 व तिसऱ्या षटकांत 28 धावा झोडपून काढल्या होत्या.