कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतानं रद्द केले इराणी नागरिकांचे व्हिसा…
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतानं इराणी नागरिकांना दिलेले ई-व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणमधील सर्वोच्च नेते अयातोला अली खामेनेई यांचे सल्लागार मोहम्मद मीरमोहम्मदी यांचा काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. चीननंतर इराणमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसंच इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत आहे. इराणमध्ये आतापर्यंत या व्हायरसची लागण होऊन ६६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १ हजार ५०१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे.
इराणी नागरिक आणि १ फेब्रुवारीनंतर इराणचा दौरा करणाऱ्या नागरिकांना जारी करण्यात आलेले व्हिसा आणि ई-व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. ज्यांनी आतापर्यंत भारतात प्रवेश केला नाही, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू आहे. हे नागरिक कोणत्याही मार्गानं भारतात प्रवेश करू शकत नाहीत, असं ब्यूरो ऑफ इमिग्रेशननं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
इराणमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय अडकले आहेत. यामध्ये विद्यार्था, भाविक आणि मच्छिमारांचाही समावेश आहे. यांच्यापैकी कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचं अद्याप समोर आलं नाही. दरम्यान, अडकलेल्या या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी संबंधित राज्य सरकारांनीही केंद्राकडे मदत मागितली आहे.