कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 300 पेक्षा अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती
विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर गर्दी होऊ नये म्हणून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. यासाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कृत्रिम तलाव तयार करण्याची जबाबदारी पालिकेने संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्तांवर सोपवली आहे. मुंबईतील २४ विभागांतील कृत्रिम तलावांची संख्या ३०० पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
मुंबईत गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटी, वरळी, दादर, वांद्रे, खार, सात बंगला, जुहू, वेसावे, गोराई, मढ, मार्वे या चौपाट्यांवर तसंच अन्य नैसर्गिक विसर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यंदा गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका असल्याने पालिकेने कृत्रिम तलावावर भर दिला आहे.
प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत १५ ते २०, तर काही ठिकाणी ३० ते ३५ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. अंधेरी के पूर्व विभागात ३५ कृत्रिम तलाव, तर दादर, माहीममध्ये १५ तलाव उभारण्याचे काम सुरू झालं आहे. त्याशिवाय फिरते कृत्रिम तलावही उपलब्ध केले जाणार आहेत. पालिकेने मागील वर्षी ३४ कृत्रिम तलाव तयार केले होते. या तलावांमध्ये ८०० ते ९०० सार्वजनिक, तर ३२ ते ३३ हजार घरगुती गणपतीचे आणि ८०० गौरींचं विसर्जन झालं होतं.