कॉ. पानसरे पुरोगामी चळवळीचे विचारपीठ – काशिनाथ नखाते
– कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे अभिवादन
पिंपरी । प्रतिनिधी
कॉ. गोविंद पानसरे यांना शहीद होऊन आज सहा वर्षे झाली. त्यांनी राज्याला दिलेले विचार, दिशा नेहमीच स्मरणात राहील. सामान्यातील सामान्य, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, वंचित यांना समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगून त्यांना संघर्षासाठी त्यांनी तयार केले. कॉ. पानसरे हे महाराष्ट्रातील पुरिगामी चळवळीचे विचारपीठ होते, असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कॉम्रेड गोविंद पानसरे यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक तुषार घाटूले, उमेश डोर्ले, निरंजन लोखंडे, ओमप्रकाश मोरया, राज पवार, छाया साबळे, सुमन अहिरे, वंदना थोरात, अनिता जावळे आदीसह कामगार उपस्थित होते.
नखाते म्हणाले की, कॉम्रेड पानसरे हे महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या कष्टकरी ,फेरीवाला, शेतकरी , सामाजिक प्रश्नावर ,विद्यार्थी कामगार, देवदासी प्रथा निर्मूलन घरकामगार महिला भूमिहीन तसेच रिक्षाचालक यांच्या बाबतीमध्ये मोठे काम केले. या बाबतीत यांनी पाठपुरावा केला. अशा विविध आघाडीवर सामाजिक विषमतेच्या क्षेत्रात सहा दशकांपेक्षा अधिक व्यवस्थेविरुद्धची लढाई व संघर्ष ही परिवर्तनवादी विचारांची चळवळ अनेक दिवस अशीच ज्वलंत राहिली. कष्टकरी महिला श्रमिक पुरुष विशेषतः तरुण वर्ग यांनाही या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले प्रचंड जनसंपर्क, ठाम मत , चिकित्सक तत्त्वज्ञानाच्या आधारे आपले मत व्यक्त करणारे, शोषणाच्या प्रत्येक संघर्षामध्ये आघाडीवर असणारे नेतृत्व म्हणजे कॉम्रेड पानसरे असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांच्या कार्याची प्रेरणा चळवळ सतत घेत राहील. असे प्रतिपादन या वेळी नखाते यांनी व्यक्त केले.