‘कॉपीमुक्त परीक्षा’ अभियान कागदावरच, कॉपीची परंपरा कायम
कृतिपत्रिका असूनही दहावीच्या परीक्षेत यंदा गैरप्रकार
राज्यात दहावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त परीक्षा अभियान कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव देणाऱ्या, स्वमत मांडू देणाऱ्या कृतिपत्रिकांची पद्धत अवलंबूनही दहावीच्या परीक्षेत राज्यभरात कॉपीची ‘परंपरा’ यंदाही कायम असून, भाषा विषयांमध्येही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचे प्रकार उघडकीला आले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यभरातील ४ हजार ८७४ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होत आहे. यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. तसेच उत्तरपत्रिकांच्या ऐवजी कृतिपत्रिकांची पद्धत स्वीकारण्यात आली. घोकंपट्टी केलेल्या उत्तराऐवजी विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकांमध्ये स्वतचा विचार मांडण्याची संधी आहे. हा बदल समजून घेण्यासाठी आणि कृतिपत्रिकांचा सराव होण्यासाठी बालभारतीकडून सरावासाठी प्रश्नपत्रिका आणि कृतिपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
मात्र, १ मार्चला पहिल्या भाषा विषयाच्या परीक्षेवेळी १११, द्वितीय, तृतीय किंवा संयुक्त भाषा प्रश्नपत्रिकेवेळी ६ आणि इंग्रजी प्रश्नपत्रिकेवेळी ८० प्रकार उघडकीस आले.
‘कॉपीचे प्रकार होऊ नये, यासाठी विभागीय मंडळांच्या माध्यमातून शक्य तितके प्रयत्न करण्यात आले आहेत. पण कॉपी न करण्याबाबत मानसिकता बदलण्याचीच गरज आहे. तसेच कृतिपत्रिकांची पद्धत रूजण्यासाठी काहीएक वेळ जावा लागेल, ’ असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.
सीलबंद प्रश्नपत्रिका नाहीत
राज्य मंडळाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने बारावीच्या परीक्षेसाठी २५ प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट पर्यवेक्ष्यकांनी परीक्षा कक्षात विद्यार्थ्यांच्या समोर उघडले जाते. मात्र, दहावीच्या परीक्षेत ही पद्धत वापरण्यात आलेली नाही.
कृतिपत्रिका विद्यार्थ्यांच्या कृतीला, विचारांना वाव देणाऱ्या आहेत. पण कृतिपत्रिकांविषयी विद्यार्थी आणि पालकांच्या मनात भीती आहे. आपला विद्यार्थी उत्तीर्ण झाला पाहिजे ही संस्थाचालक आणि पालकांची अपेक्षा आहे. त्यामुळे कॉपी केवळ विद्यार्थीच करत अस\तील असे नाही, तर बाहेरून मदत करणारे घटक दोषी आहेत. मात्र, पोलीस, केंद्रप्रमुख आणि भरारी पथके असूनही कॉपीचे प्रकार होणे गंभीर आहे. भाषा विषयांच्या तिन्ही प्रश्नपत्रिका कोणीही उत्तीर्ण व्हावे, इतक्या सोप्या होत्या.
– डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ