केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या १७ वर, जखमींवर उपचार सुरू
नवी दिल्ली – दुबई-कालिकत हे एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धावपट्टीवरून घसरून दरीत कोसळलं यामुळे पायलटसह १७ जणांचा मृत्यू झाला. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९० जण होते. तर, जखमी ११० जणांना कोझीकोडमधील हॉस्पिटलमध्ये आणि ८० जणांना मलप्पूरममधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती मलप्पुरमचे जिल्हाधिकारी के. गोपाळकृष्णन यांनी दिली. विमानाच्या दोन्ही पायलटचा मृत्यू झालाय. तर ४ केबिन क्रू मेबर्सं वाचले.
विमान दरीत पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या विमानात एकूण १९० प्रवासी होते. यामध्ये १७४ प्रौढ, १० बालकं आणि ६ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. अपघात होताच अवघ्या दीड तासाच्या आत बचावकार्य पूर्ण केलं गेलं. सर्व मौल्यवान वस्तू आणि इतर वस्तू साहित्य ताब्यात घेण्यात आलं आहे. कोझिकोडमधील ७ हॉस्पिटल्समध्ये ११० जणांना दाखल करण्यात आलं असून त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे, असं गोपालकृष्णन यांनी सांगितलं.