केरळी बांधवांना गृहराज्यात पाठवण्यासाठी प्रदेश काँग्रेसचा विशेष हेल्पडेस्क!: बाळासाहेब थोरात
मुंबई ।महाईन्यूज । प्रतिनिधी
अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने केरळी बांधव मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या मूळगावी केरळमध्ये जाण्यासाठी व इतर मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पाच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा हेल्पडेस्क सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मुल्लपल्ली रामचंद्रन यांना पत्र पाठवून दिली आहे.
हेल्पडेस्कच्या माध्यमातून स्थलांतरित केरळी बांधवांना त्यांच्या गृहराज्यात अर्थात केरळमध्ये जाण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. या हेल्प डेस्कमध्ये जॉर्ज अब्राहम (9820408802), मोहसीन हैदर (9820748399), किशोर मुंदकेल (9833322445), मॅथ्यू अंटोनी (9870323964) व जोजो थॉमस (9920442272) या पाच पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व जग चिंतेत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून हे संकट निवारण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी स्थलांतरित मजूर बांधवांना सर्वतोपरी मदत करत आहे. जिल्हानिहाय सुरु केलेल्या हेल्पलाईन मार्फत स्थलांतरीत मजूरांची नोंदणी केली जात असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे त्यांच्या प्रवासाचा खर्च केला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे २८ हजारांपेक्षा जास्त मजूरांचा प्रवास खर्च उचलण्यात आला आहे, असे थोरात म्हणाले.