केंद्र सरकारच्या डेडलाईननंतर अखेर भारती एअरटेलने १० हजार कोटी केले जमा…
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आणि केंद्र सरकारने डेडलाईन आखून दिल्यामुळे अखेर भारती एअरटेलने महसुली उत्पन्नापोटी देय असलेले १० हजार कोटी रुपये दूरसंचार विभागाकडे जमा केले आहेत. उर्वरित देय रक्कम कंपनीतील अंतर्गत आढाव्यानंतर दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीचा अंतर्गत आढावा घेण्यात येत असून, त्यानंतर उर्वरित रक्कम लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. ज्यावेळी उर्वरित सर्व रक्कम दिली जाईल. त्यावेळी त्याचे सर्व हिशेबही सरकारकडे सादर केले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १४ फेब्रुवारीपासून केंद्र सरकारने भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांना थकीत महसुली देय तातडीने देण्यासाठी नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ही थकीत देय दिल्यामुळे आमच्या व्यवसायावर विपरित परिणाम होईल. आम्हाला व्यवसाय बंदच करावा लागू शकतो, असे व्होडाफोन-आयडियाने म्हटल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.