किती दलित, मुस्लिमांना भारतरत्न दिले ? ओवेसींचा सवाल
कल्याण – भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात सरकारने दुजाभाव केला आहे. आतापर्यंत किती दलित, मुस्लिम आणि आदिवासींना भारतरत्न देण्यात आला असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांचे आता वय झाले आहेत. दलित बांधवांनो ते तुमच्यासाठी जिवंत आहेत, त्यांच्या पाठीमागे उभे राहा. अशी भावनिक सादही ओवेसींनी घातली. कल्याण येथे सत्तासंपादन मेळाव्यात ते बोलत होते.
तीन तलाक विधेयक संसदेत मांडण्यात आले, त्यावेळी मी विरोध केला. तुमच्या या भावाने विरोध केला. इतर कुणीही विरोध केला नाही. जर प्रकाश आंबेडकर संसदेत असते तर, संपूर्ण संसद हलून गेली असती, असे ओवेसी म्हणाले.
केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता ओवेसींनी जोरदार टीका केली. ओवेसी म्हणाले, आठवले फक्त कविता करतात. त्यांना दलित बांधवांसाठी संसदेत पाठविले. परंतु ते तुमच्यासाठी काहीच करत नाहीत, असा आरोपही ओवेसींनी केला. मुस्लिम महिलांच्या तलाकवर बोलणा-यांनो गुजरातच्या बहिणीबाबत कुणीही बोलत नाही. आमच्या बहिणीलाही दिल्लीला बोलवा. काँग्रेसची मंडळीही याबाबत काही विचारत नाहीत. कारण सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतात. कारण सगळे लिमिटेड कंपनी आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा हे एकच आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.