कंपन्यांमधील कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लपवू नये- अजित पवार यांनी दिली तंबी
पुणे जिल्ह्यात अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांमधील कामगारांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती आहे. पण काही कंपन्या ही माहिती लपवत असल्याचं सांगितलं जातंय. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंबी दिलीय. ‘जिल्ह्यातील काही कंपन्यांमध्ये कामगारांना करोनाचा प्रार्दुभाव होत असताना, कंपनीचे कामकाज बंद राहण्याच्या शक्यतेने काही कंपन्या माहिती लपवून ठेवत आहेत. कंपन्यांनी माहिती लपवून न ठेवता प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. अन्यता संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाईल’ अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी शहरांबरोबर ग्रामीण भागात ‘पोस्ट कोव्हिड ओपीडी’ सुरू करा आणि शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी उपचाराचे दर निश्चित करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी विधान भवन येथे करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘कंपन्यांमधील कामगारांमुळे प्रार्दुभाव वाढू नये, यासाठी कंपन्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कंपनीचे कामकाज बंद ठेवले जाईल, या शक्यतेने करोनाबाधित कामगारांची माहिती लपवून ठेऊ नये’
करोनातून बरे झालेल्या रुग्णांचे समुपदेशन आणि आवश्यकता भासल्यास औषधोपचारासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसाठी ताबडतोब ‘पोस्ट कोव्हिड ओपीडी’ सुरू करण्याचे आदेश देऊन पवार म्हणाले, ‘करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, घरी गेल्यानंतर या रुग्णांना त्रास होत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसाठी पाच ठिकाणी ‘पोस्ट कोव्हिड ओपीडी’ सुरू करण्यात येणार आहेत. पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर येथील कोव्हिड रुग्णालय व नायडू रुग्णालय या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर ओपीडी सुरू करण्याची कार्यवाही करावी. शहरांप्रमाणे ग्रामीण भागासाठीही या ओपीडी सुरू करण्यात याव्या. तसेच शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी उपचाराचे दर निश्चित करण्यात यावे’
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांवर वेळेत उपचार होऊन संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. मात्र, शहरात काही नागरिक अद्यापही मास्क न घालता रस्त्यांवर फिरताना आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे’ असे त्यांनी सांगितले.