मोरा ते मुंबई जलवाहतूकीच्या वाढीव तिकीट दरांत १० रुपयांची कपात
उरण – उरणमधील मुंबईत नोकरी करणारे चाकरमानी, व्यावसायिक आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीच्या ठरणाऱ्या मोरा ते मुंबई या जलवाहतूकीच्या तिकिटाच्या वाढीव तिकीट दरांत आता १० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने घेतला आहे.
डिझेल दरवाढीचे कारण देत या जलवाहतुकीसाठी २० रुपयांची वाढ जलवाहतूक संस्थेने केली होती. यावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने दखल घेत आता १० रुपयांनी तिकीट दर कमी केले आहेत. त्यामुळे ९० रुपये झालेले तिकीट दर आता ८० रुपये झाले आहेत. यामध्ये तिकिटाचे दर ७० रुपये असून १० रुपये प्रवासी कर आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या निगराणीखाली मोरा ते मुंबई दरम्यानची जलसेवा सुरू आहे. मुंबईला जोडणारी बारमाही अशी ही एकमेव जलसेवा आहे. मात्र डिझेलची दरवाढ झाल्याने जलवाहतूक संस्थेने दर वाढविण्याची मागणी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे केली होती. त्यानुसार पावसाळी कालावधीसाठी २० रुपयांनी वाढविण्यात आलेले तिकीट दर कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे या प्रवासासाठी ९० रुपये प्रवाशांना मोजावे लागत होते. एक वर्षात ४५ रुपयांवरून हे तिकीट दर ९० रुपये झाले होते. यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने २० रुपये झालेली तिकीट दरवाढ कमी करत आता १० रुपये वाढ कायम ठेवली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रभाकर पवार यांनी दिली. आता मोरा ते मुंबई दरम्यानचे तिकिट दर हे ८० रुपये असणार आहे.