औरंगाबाद – पनवेल लवकरच खासगी रेल्वे, निती आयोगाकडून मंजूरी
सोलापूर|महाईन्यूज|प्रतिनिधी|
नीती आयोगाच्या मंजुरीनंतर आता महाराष्ट्रात खासगी रेल्वेगाड्या सुसाट धावणार आहेत. सोलापूर, औरंगाबाद, पुणे, अकोला, शिर्डी आदी स्थानकांहून रेकची व्यवस्था झाली आहे.
आयआरसीटीसीने २० गाड्यांचे वेळापत्रक आखले आहे. काही दिवसांत या रेल्वे धावण्यास सुरुवात होईल. मसुद्यानुसार, खासगी रेल्वे चालवणाऱ्या कंपन्यांना बाजारभावाने तिकीट आकारणीचा अधिकार देण्यात आला आहे. गाडी कोणत्या स्थानकावर थांबावयाची याचाही अधिकार कंपनीला असेल. सरकारीच्या तुलनेत प्राधान्य : १५ मिनिटांआधी सुटणार खासगी रेल्वे, १६० किमी वेगाने धावण्यासही परवानगी
खासगी रेल्वे फायद्यात धावाव्यात म्हणून भारतीय रेल्वेने अक्षरश: पायघड्या घातल्या आहेत. भारतीय रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटांआधीच ही खासगी रेल्वे सुटतील. इतकेच नव्हे, तर खासगी रेल्वेस १६० किमी वेगाने धावण्याची परवानगीही देण्यात आली अाहे. शिवाय या खासगी रेल्वेगाड्यांना यांना प्रथम प्राधान्य देण्याचेही ठरले आहे. खासगी रेल्वेत चालकांपासून ते गार्ड व तिकीट तपासणीस हे सगळी खासगी कर्मचारी असणार आहे.
सुविधा वाढणार, मात्र सरकारी सवलती नाही
या सुविधा – विमानातील हवाईसुंदरीप्रमाणे खासगी रेल्वेत रेल्वे सुंदरीची नियुक्ती केली जाईल. खाद्यपदार्थ चांगले दर्जाचे असतील. या गाड्यांना तासाभरापेक्षा अधिक विलंब झाला तर तिकिटाची निम्मी रक्कम प्रवाशांना परत केली जाईल, अशी हमी आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे.
या सवलती नाही – खासगी रेल्वेत प्रवाशांना सरकारी रेल्वेप्रमाणे तिकीट दरात कोणतीच सवलत देण्यात येणार नाही. शिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे पासदेखील या खासगी रेल्वेत चालणार नाहीत. या रेल्वेत भारतीय रेल्वेचे कर्मचारी नसून खासगी मक्तेदाराचे कर्मचारी काम करतील.
२० गाड्यांचे वेळापत्रक
पनवेल-औरंगाबाद आठवड्यातून दोन दिवस
पनवेल-कलबुर्गी व्हाया सोलापूर तीन दिवस
पनवेल-नागपूर दररोज
पुणे -गुवाहाटी : १ दिवस
बांद्रा-अकोला ३ दिवस
परेल-शिर्डी ३ दिवस