औरंगाबाद जिल्हातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली
औरंगाबाद – देशभरात सध्या अनलॉकच्या प्रक्रियेत अटी-शर्थींसह टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरू होत आहेत. लॉकडाऊनमुळे देशभरातील पर्यटन स्थळंही बंद करण्यात आली होती. आता पर्यटन स्थळंही सुरु करण्यास परवागी देण्यात आली आहे. त्यानंतर आता तब्बल 8 महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे आजपासून सुरू करण्यात आली आहेत. जागतिक वैभव लाभलेल्या अजिंठा-वेरुळ लेण्याही पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते काल अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लेणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ पार पडला. त्यानंतर लेण्यांच्या परीसरात स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आजपासून लेण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, पर्यटकांना मास्क आणि सोशल डिस्टान्सिंगसह इतर सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजी घ्यावी लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे अजिंठा-वेरुळ लेण्या पाहण्यासाठी दर दिवशी केवळ 2 हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. त्यासाठी पर्यटकांना केवळ ऑनलाईन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करावी लागणार आहे. पर्यटक पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट नोंदणी करू शकतील. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल.