‘२०१९ चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ’
यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी आणि ऐतिहासिक ठरले. मराठा आरक्षणाच्या विधेयकास विधिमंडळाने एकमुखाने मान्यता दिली. या अधिवेशनात विधानसभेत ११ तर दोन्ही सभागृहात १४ विधेयक संमत झाले. या संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी मराठा आरक्षण, दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले. शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले. अखेरच्या दिवशी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कविता आणि शेरोशायरीचा वापर करत विरोधकांवर निशाणा साधला. कवितेतून त्यांनी आगामी निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना युतीचा दाखलाही दिला. फडणवीसांच्या कोपरखळ्यांनी सभागृहात विनोदाचे वातावरण दिसून आले.
विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस यांनी सरकारची कामगिरीच वाचून दाखवली. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला. विशेषत: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेली कविता अशी..
माझ्यावर टीकेची करुन कामना, विखे पाटीलसाहेब वाचतात सामना
संघर्ष यात्रेला लाभत नाही गर्दी, म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी
जनता जनार्दन आहे आमच्या बाजूला, म्हणून तुमची खुर्ची असेल त्याच बाजूला
२०१९ चा संग्राम आला जवळ, बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ
त्यांच्या या कवितेला विरोधकांनीही दाद दिली. मुख्यमंत्र्यांनी नंतर शेरोशायरीही केली. अखेरच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शांततापूर्ण चर्चा झाली.