औरंगाबादेत प्रत्येक दुकानदाराला कोरोना टेस्ट बंधनकारक
औरंगाबाद | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा आज महत्वपूर्ण निर्णय घेतला. भाजीपाला, फळ, दूध, चिकन- मटन आणि किराणा दुकानदाराने रविवार पूर्वी कोविड-19 टेस्ट करणे बंधन कारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल त्यालाच रविवार पासून दुकान उघडण्याची परवानगी राहणार.
शनिवारी रात्री बारा वाजता नियोजित संचारबंदी संपुष्टात येणार आहे. रविवारी ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना टेस्ट केलेले निगेटिव्हचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल. शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, दूध विक्रेते, चिकन- मटन, किराणा दुकानदारांना पहिल्या टप्प्यात प्रमाणपत्र मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यापाऱ्याकडे प्रमाणपत्र नाही त्याने दुकान उघडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात मेडिकल दुकानदार, इलेक्ट्रीक, शोरूम, पंचर दुकानदार यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांना 25 ते 31 जुलैपर्यंत कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक राहणार आहे. शहरात व्यापक प्रमाणात तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घ्यावा असेही प्रशासक यांनी नमूद केले.