औरंगाबादमध्ये पुन्हा संचारबंदीने कष्टकरी आणि व्यावसायिक हवालदिल
कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी औरंगाबाद शहरात शुक्रवारपासून म्हणजे दहा जुलै पासून नऊ दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असतानाच पुन्हा संचारबंदीने कष्टकरी आणि व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या कुटुंबांना पुन्हा बिकट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या कठीण ‘लॉकडाऊन’नंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास नेमकी सुरुवात झाली होती. उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार पुन्हा सुरू झाले होते, मात्र बाजारपेठेत योग्य नियम पाळले जात नसल्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहर नऊ दिवस बंद राहणार आहे. परिणामी, हातावर पोट असलेल्या कुटुंबांचे पुन्हा हाल होणार आहेत.
बिगारी कामगार, पानटपरी चालक, भाजीविक्रेते, फळविक्रेते, किरकोळ वस्तू विक्रेते, रिक्षा चालक, हमाल, घरेलू कामगार, सफाई कामगार, फिरस्ते व्यवसायिक अशा असंघटित क्षेत्रातील हजारो कुटुंबांना जनता संचारबंदीची झळ बसणार आहे.