एसटी बस सेवा सुरु झाल्या तरी, प्रवाशांचा प्रतिसाद कमीच
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन हटवत महाराष्ट्रात हळूहळू बंद केलेल्या सेवा पुन्हा सुरु करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांच्या मनातील भीती अद्यापही कमी व्हायला तयार नाही. नागरिकांच्या मनातील भीती आंतरजिल्हा एसटी सेवा प्रवासाच्या माध्यमातून स्पष्टपणे पुढे आली. राज्यात आजपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ एसटी बस सेवा सुरु करण्यात आली. मात्र, एसटी सेवा सुरु झाल्याची पूरेशी माहिती न मिळाल्याने किंवा कोरोना व्हायरस संसर्गाच्या भीतीने प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. परिणामी रस्त्यांवर सुरुवातीच्या काळात एसटी बस एखाद दुसऱ्या प्रवाशांचा अपवाद वगळता रिकामीच धावताना दिसली.
राज्यात आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करण्यास राज्य परिवहन मंडळाच्या बसला राज्य सरकारने आजपासून परवानगी दिली. त्यानुसार बसस्थानकांवर एसटी दाखलही झाल्या. मात्र, प्रवासीच नसल्याने बसस्थानकांवर सामसूम वातावरण दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र प्रथमदर्शनी तयार झाले आहे.
राज्यातील एसटी बस सेवा बंद होऊन साधारण पाच महिन्यांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर आज एसटी बस बसस्थानकांवर दाखल झाल्या. प्रदीर्घ काळानंतर बस सेवा सुरु होत असल्यामुळे प्रवाशांची गर्दी पाहायला मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, एसटी वाहतूकीस प्रवाशांकडून न मिळालेल्या प्रसिदाबद्दल विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहींच्या मते एसटी वाहतूक सुरु झाल्याची माहिती अद्यापही नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचली नाही. तर काहींना वाटते की प्रवासासाठी खूप लोक गर्दी करतील. त्यातून कोरोना संसर्ग होण्याची भीती वाटत असल्याने लोक प्रवास करणे टाळत आहेत.