एका प्रकरणामुळे राज्याची बदनामी होते याचं दु:ख- मुख्यमंत्री पिनराई विजयन
केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात फटाकेयुक्त अननस खाल्ल्यामुळे गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये याच्या बातम्या यायला लागल्यानंतर, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. केरळ पोलीस आणि वन-विभागाने याप्रकरणी पावलं उचलत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी पोलीसांनी ३ संशयितांवर काम करत असून, हत्तीणीच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकार करेल असं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटलं आहे.
In a tragic incident in Palakkad dist, a pregnant elephant has lost its life. Many of you have reached out to us. We want to assure you that your concerns will not go in vain. Justice will prevail.
— Pinarayi Vijayan (@pinarayivijayan) June 4, 2020
हत्तीणीला जंगल सोडून गावात येऊन हे फळ का खावं लागलं याचाही सरकार तपास करेल असं विजयन यांनी स्पष्ट केलं. मात्र या प्रकरणावरुन सोशल मीडियावर केरळ सरकारच्या होणाऱ्या बदनामीविरोधात विजयन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “या प्रकरणाचा आधार घेऊन काही लोकं केरळ सरकार आणि जनतेविरोधात गरळ ओकत आहेत, हे पाहून मला दुःख झालं. केरळमधील जनतेने नेहमी अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. अपुरी माहिती आणि अर्धसत्याच्या आधारावर सरकारविरोधात अजेंडा राबवण्याचं काम सुरु आहे. काही घटकांकडून या दरम्यान चुकीचा पायंडाही पाडण्याचा प्रयत्न केला जातोय.”
केरळ वन-विभागाचे अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे हत्तीणीवर झालेल्या अत्याचाराची गोष्ट सर्वात प्रथम प्रसारमाध्यमांसमोर आली. यानंतर सोशल मीडियावर या घटनेविरोधात संताप व्यक्त होऊ लागला. अनेक सेलिब्रेटींनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. केंद्रीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली गेल्यामुळे अखेरीस केरळ सरकारने या प्रकरणात मारेकऱ्यांविरोधातला तपास जलद गतीने करायला सुरुवात केली आहे.