‘एकदिवसीय मालिका जिंकल्याचा विश्वास कसोटी मालिकेत उपयुक्त
- इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोला आत्मविश्वास
लंडन: भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या टी-20 मालिकेत पराभव झाल्यानंतर पहिला एकदिवसीय सामनाही गमावला, तेव्हा इंग्लंडवर कमालीचे दडपण होते. जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ असल्यामुळे ते स्वाभाविकही होते. परंतु पुढच्या दोन्ही एकदिवसीय लढती आम्ही ज्या प्रकारे जिंकल्या आणि एकदिवसीय मालिकेवर वर्चस्व गाजविले, त्यामुळे मिळालेला विश्वास आगामी कसोटी मालिकेसाठी आम्हाला निश्चितपणे उपयुक्त ठरेल, असा आत्मविश्वास इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो याने व्यक्त केला आहे.
भारतीय संघाने फिरकी गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर टी-20 मालिका जिंकून इंग्लंड दौऱ्याची सुरुवात जोरदार केली होती. इतकेच नव्हे तर पहिला एकदिवसीय सामनाही भारताने ज्या प्रकारे जिंकला, त्यावरून या दौऱ्यातील उरलेल्या सामन्यांबद्दल इंग्लंडच्या पाठीराख्यांना चिंता वाटणे स्वाभाविक होते. मात्र इंग्लंडने दुसऱ्या व तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत एकतर्फी विजयाची नोंद करताना भारतीय संघावर बाजी उलटविली. जो रूटने सलग दोन शतके झळकावून भारतीय गोलंदाजांचा, विशेष करून भारतीय स्पिनर्सचा दबदबा मोडून काढला. तसेच वेगवान गोलंदाज डेव्हिड विली आणि लेगस्पिनर आदिल रशीद यांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजविताना इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
एकदिवसीय संघातील अनेक खेळाडू इंग्लंडच्या कसोटी संघातही खेळणार असल्यामुळे आणि कसोटी मालिकाही लवकरच सुरू होत असल्याने आमच्या खेळाडूंच्या आत्मविश्वासात भर पडणे अपेक्षितच आहे, असे सांगून बेअरस्टो म्हणाला की, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध पिछाडीवरून मालिका जिंकणेही आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावणारेच ठरले. अर्थात एकदिवसीय क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेट हे संपूर्णपणे वेगळे आहे, त्यातील डावपेचही वेगळे असतात, तसेच कसोटी मालिका जिंकण्यासाठी आपल्याला काहीतरी खास कामगिरी करावी लागेल हेही आम्हाला माहीत आहे.