breaking-newsमहाराष्ट्र

ऊसतोड कामगाराच्या मुलाची २० लाखांच्या खंडणीसाठी हत्या

बीडमधील आष्टी तालुक्यात १४ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मारेकऱ्यांनी हत्येपूर्वी मुलाच्या कुटुंबीयांकडे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, दिशाभूल करण्यासाठी मारेकऱ्यांनी ही चिठ्ठी ठेवली असावी, असा संशय आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी गणेशच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आष्टी तालुक्यातील केरुळ या गावात एकनाथ आंधळे, पत्नी, मुलगा गणेश आणि दोन मुलींसह राहतात. गणेश आंधळे (वय १४) हा सातवी इयत्तेत शिकतो. गणेशचे आई- वडील हे ऊसतोडणीच्या कामासाठी बाहेर गेले होते. १२ डिसेंबर रोजी शाळेतून परतल्यावर गणेश खेळण्यासाठी संध्याकाळी घराबाहेर गेला. यानंतर तो घरी परतलाच नाही. आई- वडीलांनी पोलिसांकडे गणेश बेपत्ता असल्याची तक्रार देखील केली. रविवारी सकाळी एका तरुणाला गावातील रस्त्यावरील दगडावर एक चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी हिंदीत लिहिली होती. ‘मुलाच्या सुटकेसाठी २० लाख रुपये द्यावे, अन्यथा त्याची हत्या करु, अशी धमकी चिठ्ठीत देण्यात आली होती. ‘पोलिसांकडे जाऊ नका, पोलिसांकडे गेलात तर तुमच्या मुलीचेही अपहरण करु’, असे देखील चिठ्ठीत म्हटले होते.

पोलिसांनी अपहरणाच्या दृष्टीने घटनेचा तपास सुरु केला. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास गावातील शिवारात गणेशचा मृतदेह आढळला. मृतदेहावर अॅसिडही टाकण्यात आले होते. गणेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून २० लाखांची खंडणी का मागितली जाईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनीही तपासात दिशाभूल करण्यासाठी ही चिठ्ठी ठेवण्यात आली होती. गणेशची हत्या अगोदरच झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला. पोलिसांनी या प्रकरणात गणेशच्या दोन मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button