‘ईव्हीएम’ हॅकर खोटारडे?, मग माझ्यावर आरोप करणा-या ‘हॅकर’वर विश्वास का ठेवला?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Eknath-Khadse2-11.jpg)
2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅकिंगबद्दल माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळे त्यांच्या हत्तेचा कट रचल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या हॅकरने केला आहे. त्याला उत्तर देताना भाजपने हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित करत हा आरोप खोडून काढला. आता तोच धागा पकडून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. हॅकर खोटारडे असतात तर मग माझ्या प्रकरणात हॅकरवर विश्वास का ठेवला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळेच माझी राजकीय बरबादीला झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
अडचणीत सापडलेल्या भाजपने हॅकर खोटारडे असतात असे म्हटले. पण, आता याच मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी स्वपक्षाला अर्थात भाजपला खोचक सवाल विचारला आहे. एका जाहीर कार्यक्रमात खडसे बोलत होते. ईव्हीएम हॅकिंगबद्दल भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाली असा दावा सय्यद शुजा या हॅकरने केला. त्याने भारतात ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते, असाही दावा केला. मात्र, भाजपाने एका हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा, असे म्हणत सर्व आरोप फेटाळले होते.
त्यावर खडसे म्हणाले की, माझ्यावरही एका हॅकरने (मनीष भंगाळे) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याच्या पत्नीशी फोनवर संवाद साधत असल्याचा दावा केला होता. चौकशी झाली, पण यात काहीच हाती लागले नाही. पण, माझे राजकीय आयुष्य बरबाद झाले. माझ्यावेळी हॅकरवर का विश्वास ठेवण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खडसे यांच्या आरोपामुळे भाजपात खळबळ उडाली आहे. त्यांच्या बोलण्यातून संशयाची सुई भाजपाच्या दिग्गज नेत्यांकडे वळत असल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.