आसाम रायफल्सला केंद्राचे व्यापक अधिकार
ईशान्येकडील राज्यांमध्ये वॉरंटशिवाय कुणालाही अटक करता येणार
नवी दिल्ली : आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड व मिझोराम या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुठल्याही वॉरंटशिवाय कुणालाही अटक करण्याचा, तसेच एखाद्या ठिकाणाची झडती घेण्याचे अधिकार केंद्र सरकारने आसाम रायफल्सच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
आसाम रायफल्समधील सर्वात कमी दर्जाच्या कर्मचाऱ्याच्या समकक्ष असलेल्या अधिकाऱ्याला फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार हे अधिकार देण्यात आल्याचे गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड व मिझोराम या ईशान्येकडील राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्य़ांमधील भागाच्या स्थानिक सीमांमध्ये आसाम रायफल्सचे कर्मचारी फौजदारी प्रक्रिया संहितेतील (सीआरपीसी) संबंधित कलमांनुसार या अधिकारांचा वापर करून त्यांचे कर्तव्य पार पाडतील, असे अधिसूचनेत नमूद करणअयात आले आहे.
सीआरपीसीच्या कलम ४१ अन्वये, कुठलाही पोलीस अधिकारी दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय किंवा वॉरंटशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतो. तर ज्याला अटक करण्याचा अधिकार आहे अशा व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करण्याच्या उद्देशासाठी एखादा पोलीस अधिकारी त्या व्यक्तीचा भारतात कुठेही पाठलाग करू शकतो, असे कलम ४८ मध्ये नमूद केले आहे.
आसाम रायफल्सविषयी
आसाम रायफल्स हे ईशान्येतील आघाडीचे घुसखोरीविरोधी दल आहे. ते संवेदनशील अशा भारत- म्यानमार सीमेचे रक्षणही करते. ईशान्येच्या काही भागात लागू असलेला सशस्त्र दले विशेषाधिकार कायदा (अफस्पा) देखील या भागात कार्यरत लष्कराला अशाच प्रकारचे अधिकार देतो.