‘इंद्रायणी थडी’ला महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी; ६.५० लाख नागरिकांची हजेरी
- तब्बल ५०० स्वयंसेवकांच्या सहभागाने जत्रेची यशस्वी सांगता
- आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उपक्रमाची राज्यभर चर्चा
पिंपरी । प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ जत्रा ‘इंद्रायणी थडी’ ची आज सांगता झाली. या यात्रेच्या शेवटच्या दिवसअखेर सुमारे ६.५० लाख नागरिकांनी हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला सक्षमीकरण, मनोरंजन आणि प्रबोधन अशा तिन्ही पातळीवर ही जत्रा राज्यात ‘रोल मॉडेल’ ठरली आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे नियोजन करण्यात आले. ‘महिला सक्षमीकरण’ साठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना या जत्रेत मोफत प्रवेश ठेवण्यात आला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिकांनी जत्रेला प्रतिसाद दिला.
जत्रेच्या पहिल्याच दिवशी ८५ हजारहून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. दुसऱ्या दिवशी १ लाख १८ हजार नागरिकांनी जत्रेला हजेरी लावली. तिसऱ्या दुवशी तुफान गर्दी झाली होती. जत्रेच्या चार दिवसात सुमारे साडेसहा लाख लोकांनी जत्रेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे, चार दिवसात एकूण ८०० स्टोलवर सुमारे २ कोटी ५५ लाख रुपयांची उलढाल जत्रेत झाली आहे, अशी माहिती जत्रेचे समन्वयक संजय पटनी यांनी दिली.
‘इंद्रायणी थडी’चे उदघाटन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. ‘इंद्रायणी थडी’ जत्रेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. तब्बल ८०० विविध स्टॉल उभारण्यात आले असता यामध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती, ‘रामायण’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘लेझर शो’, धर्मवीर संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, बालजत्रा, शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन, गड-किल्ले यांचे छायाचित्र प्रदर्शन, मर्दानी खेळ, फॅशन शो, ग्राम संस्कृती, ऐतिहासिक फुले वाडा, रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा, नृत्य स्पर्धा आदी विविध उपक्रमांसह मनोरंजनाचे विविध खेळ आणि विशेष म्हणजे, तब्बल ३०० हुन अधिक विविध खाद्यपदार्थांची पर्वणी असलेल्या या जत्रेला नागरिकांचा प्रतिसाद लक्षणीय आहे.
अतिभव्य सोहळ्याची ‘निर्विघ्न’ सांगता
महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा इंद्रायणी थडी सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी झाली. चार दिवस तुफान गर्दी झालेल्या या जत्रेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तब्बल ५०० स्वयंसेवकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे ‘इंद्रायणी थडी’ जत्रा यशस्वीपणे पार पडली. वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. तसेच, स्टॉलधारक आणि येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होवू नये. पायाभूत सोई- सुविधा याची संयोजकांनी काळजी घेतली आहे.