आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज निवड
नवी दिल्ली- 15 सप्टेंबरपासून युएईत होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआय शनिवारी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या वानखेडे मैदानातील बीसीसीआयच्या मुख्यालयात बैठक पार पडली जाणार आहे.
आशिया चषक स्पर्धेकरिता बांगलादेशने आपला संघ जाहीर केलेला आहे. ही स्पर्धा 15 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. भारताला अ गटात पाकिस्तानचा सामना करावा लागेल, तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्ताना यांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. अ गटातील अन्य संघ पात्रता फेरीतीन निकालानंतर ठरतील. त्या शर्यतीत संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया आणि हॉंगकॉंग आहेत.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनी यष्टीरक्षक म्हणून संघात आपली जागा कायम राखेल असा अंदाज असला तरी दिनेश कार्तिक अथवा ऋषभ पंत यांनाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरीक्त गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार हा फिट असल्यामुळे त्याची संघातली निवड पक्की मानली जात आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव जोडीवर असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. भारतीय संघ आशियाई चषकाचा गतविजेता आहे, त्यामुळे यंदा आपलं विजेतेपद भारत कायम राखेल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.