आर्थिक भागीदारी चर्चेसाठी पंतप्रधान मोदी बँकॉकमध्ये
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रादेशिक सर्वकष आर्थिक भागीदारी करारावरील (आरसीईपी-आरसेप) वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून भारत त्यात सहभागी होतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी या वाटाघाटीत सहभागी होण्यासाठी येथे दाखल झाले आहेत. या करारात एकूण १६ आशिया-पॅसिफिक देशांचा सहभाग अपेक्षित आहे. भारताने यात सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सोडून इतर १५ देश या वाटाघाटींना अंतिम स्वरूप देण्यात आघाडीवर आहेत. बँकॉकच्या उत्तरेला असलेल्या नाँथाबुरी या शहरात या वाटाघाटींसाठी विविध देशांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. या कराराच्या निमित्ताने बैठका सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिखर बैठकांसाठी येथे आगमन झाल्यानंतर ते म्हणाले की, व्यापारातील असमतोल हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. जर भारताची बाजारपेठ खुली करायची म्हटले तर त्याच्या जोडीला भारतीय उद्योगांना फायदा होईल अशा इतर काही संधी दिसल्या पाहिजेत. आम्ही अत्यंत व्यवहार्य प्रस्ताव मांडले असून प्रामाणिकपणे चर्चा करीत आहोत. इतर सहभागी देशांना वाटणाऱ्या चिंता आम्ही विचारात घेण्यास तयार आहोत, पण आमचेही काही मुद्दे विचारात घेणे क्रमप्राप्त आहे. ‘आरसेप’ करार सर्वाच्या हिताचा असेल तरच तो भारत आणि इतर देशांचे हित साध्य करू शकेल.सोळावी आसियान भारत परिषद, १४ वी पूर्व आशिया परिषद आणि आरसेप परिषद अशा तीन कार्यक्रमांना मोदी उपस्थित राहणार आहेत.